जागतिक नारळ दिवस
जागतिक नारळ दिवस
आपल्याला जर एखाद्या व्यक्तीला नारळाची उपमा दिली म्हणजे तो व्यक्ती कसा असेल अर्थातच बाहेरून कठोर दिसणारा पण मनातून अगदी निर्मळ आणि मनाला भावून जाइल असा, नाही का. आणि हे जे नारळ आहे त्याचे कित्येक तरी फायदे आहेत. केवळ खाद्य आणि अखाद्य उपयोगांव्यतिरिक्त मानवी आयुष्यात महत्त्वाचे स्थान असलेल्या या फळाचा आज दिवस आहे म्हणजेच आज जागतिक नारळ दिवस म्हणजेच world coconut day आहे. म्हणूनच जाणून घेऊ याच फळाबद्दल काही विशेष व मजेशीर बाबी. नारळाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जागतिक नारळ दिन २ सप्टेंबरला साजरा केला जातो.
खाद्यपदार्थांपासून औषधांपर्यंत, पूजाविधीपासून सौंदर्यप्रसाधनांपर्यंत आणि असे अगणित उपयोग आहेत या नारळाचे. कोकोनट हा नट नाही तो स्टोन फ्रूट आहे.नारळाचे तेल हे अन्य कुठल्या फळाच्या तेलापेक्षा सौंदर्यप्रसाधनांमध्ये सर्वात जास्त वापरले जाते. नारळ हा समुद्रात कितीही दूरपर्यंत व कितीही दीर्घ काळ तरंगत जाऊ शकतो.. त्यांनतरही त्याचा रुजण्याचा गुणधर्म टिकून असतो.
नारळाला कोकोनट हे नाव अर्धे पोर्तुगीज नावाड्यांकडून तर अर्धे इंग्लंडमध्ये मिळाले आहे. १६ व्या शतकात जेव्हा या नावाड्यांनी हे फळ समुद्रकिनारी पाहिले तेव्हा त्याचे तीन डोळे त्यांना माणसाच्या दोन डोळे व एका नाकासारखे वाटले. शिवाय ते हंसऱ्या चेहऱ्यासारखे वाटले. त्यामुळे त्यांनी त्याला कोको, म्हणजे हंसरा चेहरा असे संबोधू लागले. पुढे या नारळाचा प्रवेश इंग्लंडमध्ये झाला तेव्हा कोकोपुढे नट हा शब्द जोडला जाऊ लागला. काही देशांमध्ये नारळं तोडण्यासाठी माकडांना प्रशिक्षित केले जाते. ही माकडे नारळाच्या झाडावर चढून नारळे तोडून खाली टाकतात. नारळाच्या पाण्याचा मनुष्याच्या रक्तातील प्लाझ्मासारखा काही काळ उपयोग वैद्यकीय क्षेत्रात केला जाऊ शकतो.
नारळाच्या झाडाला माडाची झाडं असे ही म्हटले जाते. नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागांचा वापर करण्यात येतो त्यामुळे त्याला कल्पतरू असेही म्हटले जाते. नारळाचे झाड हे 30 मीटर उंच असते आणि त्याला पाच ते सहा मीटर लांब फांद्या असतात. आणि ह्या फांद्यांना झावळ्या म्हणतात. नारळाचे खोड ही इतर झाडांसारखे खडबडीत नसले तरीही थोडा थोडा भाग हा झाडावर चढण्यासाठी उपयोगी असतो.नारळाचे झाड 70 ते 80 फुटापर्यंत वाढून सुद्धा ते अगदीच वाऱ्याच्या दबावात जराही न डगमगता तसेच उभे असते कारण नारळाची मुळे ही आकाराने लहान असून ती खोलवर अगदी घट्ट रुजलेली असतात. नारळाचे झाड हे ताड कुळातील आहे. जे वृत्त पृथ्वीच्या मध्यातून जाते अशा विषुववृत्त भागात तसेच उष्ण कटिबंधीय भागात आणि समुद्राच्या कडेला नारळाची झाडे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्यामुळे नारळाची झाडे ही समुद्रकिनारी असलेल्या भारतातील राज्यांमध्ये म्हणजेच गोवा केरळ तामिळनाडूच्या किनारपट्टी भागात व महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात दिसून येतात. जगभरात 70 देशात नारळाची झाडे लावली जातात आणि आपल्याला किमान 60 दशलक्ष टन इतके नारळांचे उत्पन्न जागतिक स्तरावर दरवर्षी मिळत असते. अशा माडाला महिन्यातून एकदा मोहर येतो आणि या मोहराला लागलेली फळे दहा ते बारा महिन्यातच परिपक्व होतात. त्यामुळे आपल्याला प्रत्येक महिन्याला नारळांचा एक घड तर मिळतोच.
नारळ हे हिंदू संस्कृती मध्ये खूप पवित्र मानले जाते.
हिंदी संस्कृतीमध्ये पुजा ,आरत्या करताना ब्रम्हा-विष्णू-महेश गणपती यांच्यासमोर हे श्रीफळ अर्पण केले जाते. त्याबरोबरच विशिष्ट मंगल कार्यक्रमांमध्ये नारळाचा वापर शुभ म्हणून केला जातो.
नारळपाणी पिण्याचे फायदे हे पुढील प्रमाणे आहेत. कोवळ्या नारळाला शहाळे असे म्हटले जाते. शहाळ्याचे पाणी हे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. आणि हे पाणी थंड, शक्तिवर्धक आणि खनिज संपन्न असून त्यामध्ये बरीच पोषकतत्वे असतात. नारळाचे पाणी हे गर्भवती स्त्रिया तसेच त्वचा, केस, हृदय यासाठी उपयुक्त असते.
नारळाचे पाणी चेहऱ्याला लावले असता आपली त्वचा नितळ आणि तेजस्वी होते. कोरडेपणामुळे त्वचा काळवंडली जाते आणि निस्तेज दिसते अशावेळी जेव्हा नारळाचे पाणी दुधाच्या सायीत मिसळून हळूवार चेहऱ्यावर मसाज केल्याने थोड्या दिवसात पुन्हा आपली त्वचा स्निग्ध युक्त आणि चांगली दिसते. नारळाचे पाणी केसांसाठी ही खूपच उपयोगी असते. उन्हाळ्यामध्ये जेव्हा खूपच गरमीने केसांना ची वाट लागते तसेच पावसाळ्यामध्ये ही वारंवार घेतली न गेल्याने केस निस्तेज होतात आणि त्यांना पुरेसे पोषण मिळत नाही.अशावेळी नारळाचे पाणी जरी अंघोळीपूर्वी केसांना लावले तरी केसांच्या मुळांना अगदी योग्य प्रमाणात पोषण मिळून केस चमकदार आणि मजबूत होतात. त्याचप्रमाणे गर्भवती स्त्रियांनी नारळाचे पाणी पिल्यास पोटातील बाळाला त्याचा खूप उपयोग होतो. पोटातील बाळाची त्वचा ही टवटवीत आणि रंग हा उजळतो. त्याबरोबरच गर्भवती स्त्रियांची आरोग्यही त्याकाळात निरोगी राहते. शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपले जर हृदय चांगले असेल तर आपले आरोग्य चांगले असते त्यामुळे त्या हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा नारळाचे पाणी हे अमृत आहे. अगदी सकाळी सकाळी नारळाची पाळण्याचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य हे व्यवस्थित राहते. ज्याप्रमाणे नारळाचे पाणी हा एक नारळापासून मिळणारा उपयुक्त घटक आहे त्याप्रमाणेच नारळापासून नारळाचे दूध आणि खोबरे ही मिळते. नारळाचे दूध हे त्वचेसाठी अतिशय उपयुक्त असते. तसेच खोबर्यापासून मिळणारे तेल हे केसांना लावण्यासाठी तसेच खाण्यासाठीही वापरले जाते. नारळाच्या झाडापासून माडी नावाचे पेय ही मिळवले जाते. माडी ही सुरुवातीला अतिशय थंड आणि मधुर असते पण काही वेळ ती तशीच ठेवल्यास त्याचे मद्यात रूपांतर होते. भारतात सर्वत्र बरीच लोक या माडीचे सेवन करतात.
नारळाच्या फांद्यांचा त्या सुकल्यावर खराटा बनवण्यासाठी उपयोग केला जातो. तसेच खेडेगावात काही भागात नारळाच्या फांद्या सुकण्यापूर्वी घरांच्या छपरांवर टाकून उन्हापासून संरक्षण करण्यासाठी केला जातो.
अशाप्रकारे बहुपयोगी नारळाच्या झाडाला कल्पतरू म्हणणे हे अगदी योग्यच आहे.
_ Sneha Salve

Comments
Post a Comment